मला आठवतं, मी एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. इचलकरंजीच्याच एका ग्रुप चा कार्यक्रम होता. कार्यक्रम एकदम रंगात आला होता. एक गाणं संपलं सूत्रसंचालकांनी कार्यक्रम पुढे सुरु केला.(मला जसं आठवतं तसं मी सांगायचा प्रयत्न करते.)
"सुधीर फडकेंचं HMV बरोबर असणरं contract संपत आलं होतं. दोन गाणी राहिली होती. त्यांना ती दोन गाणी खुप छान करायची होती. त्यांनी शान्ता शेळकेंना गाणं लिहिण्याची विनंती केली. त्या गाण्याची situation अशी होती, आयुष्याच्या संध्याकाळी तो आणि ती एकमेकांना भेटली आहेत. तरूणपणी ते दोघे जिथे भेटत असत तिथेच ते भेटलेले आहेत. त्यावेळी सारखीच निरव शांतता आहे, तसंच चांदणं आहे, सगळं सगळं तसंच आहे, फक्त ते प्रेम नाही. त्या वेळी जी भावी आयुष्या बद्दल स्वप्न पाहात, ती आता डोळ्यात नाहीत, त्या हळव्या भावना नाहीत.
हे सांगितल्या नंतर गाणं सुरू झालं आणि अनेकवेळा ऐकलेलं गाणं, मी नव्याने ऐकलं
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !
नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी
सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?
मीहि तोच तीच तूहि प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी